अण्णांचा राजघाट!

- चौथ्या राजकीय आघाडीची तयारी; पदरी काही न पडताही आज उपोषण सोडणार

नवी दिल्ली। दि. २
(लोकमत न्यूज नेटवर्क)
राजकारण करण्याचा घाट घालत टीम अण्णाने आता चौथी आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात, राजकीय मैदानात उतरायचे की नाही याचा फैसला करण्यासाठी जनमत आजमावले जाईल.
या वेळच्या उपोषणाकडे केंद्र सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याने झालेल्या कोंडीतून सुटका करून घेताना टीम अण्णाला २२ मान्यवरांनी केलेल्या आवाहनाचा आधार मिळाला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी उपोषण सोडणार असल्याची घोषणा खुद्द अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर केली.
अण्णांनी या वेळी २0१४च्या सार्वत्रिक निवडणुकांचा राजकीय अजेंडाच जाहीर केला. ते म्हणाले, मला राजकारणात उतरायचे नाही आणि मी उतरणारही नाही. पण, सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही; तेव्हा टीम अण्णाने राजकारणात प्रवेश करून चांगले सरकार द्यावे अशी मागणी वाढली आहे. आम्ही कोअर कमिटीची बैठक घेऊन देशातील जनतेला चांगला पर्याय देण्याचा विचार करणार आहोत. एखादा राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नाही. मात्र, मी स्वत: निवडणुकीला उभा राहणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.