डोंबिवलीकरांचे पेशवे स्मरण!

ठाणे। दि. १५ (प्रतिनिधी)
भारताच्या अर्वाचीन इतिहासावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, देशभक्तीचा, राष्ट्राच्या नवउभारणीसाठी केलेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय मुत्सद्देगिरीचा अमीट ठसा उमटवला, त्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे स्थान महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने या अद्वितीय सेनानीकडे देशाचे दुर्लक्ष झाले आहे. तरुणाईचा आदर्श असलेला हा कुशल राजकारणी, मुत्सद्दी राष्ट्रभक्त आपण मात्र मस्तानी-बाजीरावाभोवतीच फिरत ठेवला. या सेनानीची ३१२ वी जयंती १८ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत साजरी करण्यात येत आहे.
बाजीराव पेशवे यांच्याबद्दलची माहिती सांगताना डोंबिवली शहर इतिहास मंडळाचे सदस्य चंद्रकांत जोशी यांनी याबाबतची माहिती लोकमतला दिली.
छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे स्वप्न संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी थोरल्या बाजीराव पेशव्यांनी आयुष्याचा होम केला. वयाच्या उण्यापुर्‍या विशीत छत्रपती थोरले शाहू महाराजांनी त्यांच्या खांद्यावर पंतप्रधानपदाची अवघड जबाबदारी सोपवली. आपल्या वागण्या-बोलण्यातून, व्यवहारातून या थोर सेनानीने युद्ध, राजकारण, समाजकारणात प्रभाव निर्माण करणारे नवे तरुण नेतृत्व सर्व जाती, धर्म, संप्रदायांतून निर्माण केले.
आजही थोरल्या बाजीरावांची युद्धनीती (वॉर पॉलिसी) आणि युद्धरीती (वॉर स्ट्रॅटेजी) जगभराच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासक्रमात आहे. धाक, दरारा, वचक असे आश्‍वस्त जीवन भारतात निर्माण करणारा, हा अजेय सेनानी वयाच्या चाळिसाव्या वर्षी रावेरखेडी नर्मदाकिनारी २८ एप्रिल १७४0 रोजी मृत्यू पावला. मोगल, निजाम, सिद्दी, इंग्रज, पोतरुगीज या सर्वांना मराठी साम्राज्याचा वचक आणि धाक बाजी, चिमाजी या बंधूंनी निर्माण केला. या सर्व परकीयांनी आपापल्या सरकारांना लिहिलेली पत्रे पाहिले की, थोरले बाजीराव व चिमाजींची योग्यता लक्षात येत असल्याचे जोशी सांगतात.
अशा या सेनानीची ३१२ वी जयंती शनिवार, १८ ऑगस्टला आहे. त्यासाठी अभिवादन सभा डोंबिवलीत आयोजित करण्यात आली असून टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात संध्याकाळी ६.३0 ते ८ या वेळेत होत आहे. त्या कार्यक्रमाला पांडुरंग बलकवडे (इतिहास अभ्यासक) हे प्रमुख वक्ते तर डॉ. अरुणचंद्र पाठक - महाराष्ट्र राज्याचे गॅझेटियर हे प्रमुख पाहुणे आहेत. यानिमित्ताने वसई किल्ला मोहिमेतील दोन लढवय्ये कै. आन ठाकूर आणि म्यान ठाकूर यांचे डोंबिवली निवासी वंशज दीपक ठाकूर यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. त्यासाठी जिलतील इतिहासभक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे स्मृती समितीचे जयवंत कोंडविलकर यांनी केले आहे.