दुष्काळाचे संकट घोंघावू लागले

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - महाराष्ट्रासह देशाचा मोठा भाग दुष्काळाच्या छायेत आलेला असतानाच, यंदा १५ टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामानखात्याने वर्तवल्याने देशासमोरील दुष्काळाचे संकट यंदा अधिक गहिरे होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाचा अशा प्रकारचा अंदाज अधिकृतरित्या वर्तवण्यात आला आहे.
यंदा मान्सूनचे देशात काहीशा उशिराने आगमन झाले. त्यानंतर आतापर्यंत देशभर सरासरीच्या २० टक्के कमी पाऊस झाला आहे. २ ऑगस्टपर्यंत देशात सरासरी ३७८.८ मिलिमीटर पाऊस झाला असून या काळापर्यंत ४७१.४ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते.
देशात दीर्घकालीन पावसाच्या अनुमानानुसार ८९ सेंटिमीटर पाऊस अपेक्षित आहे. त्याच्या ९० टक्के आणि देशात २० टक्क्यांपेक्षा अधिक भूभागावर २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास देशव्यापी दुष्काळाची घोषणा केली जाते.
कमी पावसाचा परिणाम तांदळाच्या पिकावर होणार नसला तरी अन्य पिकांवर नक्की होईल, अशी भीती भारतीय हवामानखात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
ऑगस्ट महिन्यात सरासरीइतका पावसाचा अंदाज असला तरी सप्टेंबर महिन्यात पुन्हा कमी पाऊस पडू शकेल. या काळात पावसावर प्रतिकूल परिणाम करणारा एल निनो हा घटक कार्यरत होणार आहे.