ममतादीदींना जाब विचारणारा गजाआड

मिदनापूर। दि. ११ (वृत्तसंस्था)
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाहीर सभेत प्रश्न विचारल्याने एका इसमाला पोलिसांच्या अटकेचा सामना करावा लागला. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आपण कुठली पावले उचलत आहात? असा प्रश्न या व्यक्तीने केला होता.
माओवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या बेलपाहरी येथे गेल्या ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेदरम्यान शीलादित्य चौधरी नामक व्यक्तीने त्यांच्यासमक्ष शेतकर्‍यांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. शेतकर्‍यांचे प्राण जात असताना केवळ पोकळ आश्‍वासने देऊन भागणार नाही. तेव्हा आपले सरकार कोणती पावले उचलत आहे? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
प्रश्न विचारणारी व्यक्ती माओवादी होती. त्यामुळे त्याला अटक करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले होते. पोलिसांनी चौधरी यांना बिनापूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या नोवा खेडेगावातील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आणि जाबजबाबानंतर सोडून दिले होते. त्यांना काल रात्री त्यांच्या घरी पुन्हा अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
त्यांना आज अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रियजीत चटर्जी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले. यापूर्वी १९ मे रोजी एका टीव्ही शोमध्ये ममता बॅनर्जी यांना महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी एका विद्यार्थ्यावर माओवादी असल्याचा आरोप केला होता. पार्क स्ट्रीटवर एका अँग्लो- इंडियन महिलेवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असताना हा प्रश्न विचारण्यात आला होता.